Friday, 22 May 2020

प्रसिद्धीखोर

प्रसिद्धीखोर


ज्यास नाही स्व सिद्धी
त्यास हवी कायम प्रसिद्धी

नेट पॅक स्वस्त झाला आणि सारेच जाणकार झाले. 

गल्लीत मुके आणि फेसबुक वर बोके... असे मिरवू लागले. 
कर्माने काहीही असले तरी सारे लिहिते झाले. कालांतराने कर्माने काहीही असले तरी ते अभिनेते, चित्रकार, व्यंगचित्रकार, नर्तक, पत्रकार आणि कट्टर कार्यकर्ता होऊ लागले. राजकीय पक्षच काय, आपला धर्म, आपलं ऑफिस, आपली शाळा आणि आपला छंद हाच इतरां पेक्षा श्रेष्ठ कसा हे मांडू लागले. त्यावर भांडू लागले. एका लेखका प्रमाणेच त्यांच्या या कलेला कोण पैसा देणार हे एक दिव्यच होतं. आपण मत मांडता मांडता कधी भांडायला लागलो... हे कळलं नाही पण फुकट व्यक्त व्हायला मिळालंय ना? मग ओढा की प्रसिद्धी. 

' आपण कायम चर्चेत राहावं ' ची चटक सर्वांना लागली. त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या आल्या... पण आपल्या बोलण्याने समाजात बदनामीचे देखील पडसाद पडणार याची कोणालाच जाणीव नव्हती. ज्याला यश, अपयश, कौतुक आणि बदनामी पचवता येते ती पचन क्रिया खरी.  प्रसिद्धी मिळाल्यावर तुम्ही हजारोंचा एक चेहेरा बनता तेव्हा तुमचा खरा चेहेरा न लपवता जगण्याची हिंमत नसेल तर... सोशल मीडिया आणि वर्तमानपत्राचे उंबरठे सतत झिजवावे लागतात कारण तुम्हाला जे लोकांसमोर आणायचे नसते ते आपोआप येत राहते मग ते लपवायला हे छाप, ते छापायला हे लपव... असे मृगजळ जगणे सुरू होते. 

या बिनबुडाच्या प्रसिद्धीखोर मंडळींनी राजकारणी लोकांना दैवत मानावे... ते त्यांनी घातलेले पांढरे कपडे आणि त्यांच चारित्र्य किती हुकुमतीने जपतात.  रोज टिकांची रंगपंचमी आणि घोटाळे उघड झाले तर होणारे वस्त्रहरण... यातून ते सहज बाहेर पडतात. या सगळ्यात मात्र कार्यकर्ते ऑन स्क्रीन भांडत बसतात. हे भांडण कधी कधी ऑफ लाईन ऑन ग्राउंड देखील रूपांतरित होतं. प्रसिद्धीखोर इथेही सेल्फी काढायला जाऊन मोबाईल थोबाडावर पडून घेतात. 

Freedom of expression सोबतच आता tension of separation हे घटनात्मक व अपघातमक वाक्य... अनेकांची झोप मोड ही आपण ' एक सत्य ' मांडलं की 'आपली' किती लोकं दुखावली जातील याचे गणित अजुनही लागत नसल्यामुळे उडाली आहे... त्यामुळे प्रश्न मंडण्या पेक्षा सणां च्या शुभेच्छा देण सोप्प. कारण १३० करोड मधून कोणाच्या भावना कुठे दुखतील सांगता येत नाही... आणि त्या दुखीला औषध कुठंय? टीका, समिक्षा तर दूरच पण साधी सरळ वळणाची comment देखील अनेकांना निरुत्तर करते. त्यामुळे पुरोगामी, प्रतिगामी आणि सध्याच्या इंस्टाग्रामी जगात... ' देश मरो अपना पेट भरो ' हे सर्वांनीच स्विकारले आहे. त्यामुळे सत्य घडामोडींना बगल देऊन आपणच आपले गुलाम होऊन राहिलो आहोत... यात प्रसिद्धीखोर अग्रेसर आहेत.

करोडो लोक रोज कश्या कश्यातून व्यक्त होतात पण सत्य मांडायची भूक कोणाला नाहीये. एखादा भुकेला असला तरी त्याला कोणी भीक घालत नाही. परिस्थिती अशी आहे की खरं बोलणाऱ्याला ना कोणी मदतीचा हाथ देतय ना आधाराचा खांदा. तरी हाच व्यक्ती गेल्यावर डोक्यावर उचलायला सारेच सरसावतात कारण मेल्यावर प्रत्येक माणूस चांगलाच असतो. 

सतत सोशल मीडियावर फोटो टाकने, मत मांडत राहणे प्रतिष्ठेचे ठरत असले तरी... ऑफ स्क्रीन कोण कसा आहे हे जगाला माहीत असतेच. गोड गोड बोलून सर्वांच्या आयुष्यात Trending राहिले की तुम्ही temperory सेलिब्रिटी होता... पण कधी तरी एकदा तरी सत्य मांडून पहा. 

कलाकारांना प्रकाश झोतात राहणे ठीक, आपल्या कलाकृतीला प्रसिद्धी मिळणे ठीक पण उगाच अंधारात उदबत्ती घेऊन अंधारलेल्या इतिहासातच उजेड पाडून स्वार्थ साधत राहणाऱ्या प्रसिद्धीखोर व्यक्तींना विचारावं वाटतं 
 ' तुमचं नेमकं दुखणं काय?

- दुर्गेश विवेक निसळ

Monday, 18 May 2020

दृष्टिकोनच बदलला...

दृष्टिकोनच बदलला...

लँडलाईन वाजला की काही ठराविक मंडळीं पैकी कोणीतरी कॉल केला असणार हे लक्ष्यात येत. त्यात कस्टमर केअर, कॉम्पुटराईज कॉल, शेजारी किंवा म्हातारे आजी आजोबा आणि नातेवाईक. खरं तर असे कॉल नेमका  घरातील नको तो व्यक्ती उचलतो. त्यावर त्याला.नाही नाही ते ऐकावे पण लागते.

मागील वर्षी नोव्हेंबर मध्ये लांबच्या नात्यातल्या एकीचा कॉल आलेला. 
' हॅलो... कोण लंबोदर का?' एकदम उत्साहात. 
' हो... आपण कोण?' लंबोदर थोडं बिचकत. 
' विसरलास ना... तुम्हा मुलांना काय आता आठवणार... अरे मी अक्का बोलते आहे...' तिने थोडं खिदळत उत्तर दिलं. त्या हसण्यात आज तू बरा सापडलाय असा आव होता. 
' आई बाबा नाहीत घरी.' या लंबोदर च्या वाक्याला कानाडोळा करून तिने स्वतःच्या बोलण्याचा भडीमार चालू केला. 
' काय करतोय रे सध्या तू?'  बोलण्यात चिकित्सक पणा आणत तिने विचारलं. 

त्याच्या दुखत्या नसे वर बोट ठेवलं गेलं होतं. ओळखीतील अनेकांना माहीत होतं की तो गेट च्या परीक्षेची तयारी करतोय.
' काही नाही... अभ्यास बाकी काही नाही ' त्याने नाराजी चा सुर लपवत उत्तर दिलं. त्यावर अक्काने मात्र हो नाही काहीच न विचारता... तिचा मुलगा गणेश कसा आता विदेशात जाणारे त्याला किती जड पॅकेज मिळणारे. तू पण असच काहीतरी कर, भारतात काय ठेवलं आहे. या सगळ्या नंतर आई बाबांना सांग कॉल केला होता गणेश च सांगायला... काळजी घे. हे तिने आवर्जून सांगितलं.

या सगळ्याला लंबोदर फक्त हो हो तेवढंच बोलू शकत होता... अर्थात हा कॉल झाला हे तो काही घरी सांगणार नव्हता. 

कधीतरी नंतर. अक्का चा परत कॉल येऊन गेला. तेव्हा लंबोदर ने त्यादिवशी काहीच सांगितलं नाही हे उघड झालं. 
' विसरला असेल तो... पण तुमचे अभिनंदन. गणेश ला पण शुभेच्छा.' असं म्हणून लंबोदर ची पाठराखण झाली. 

खरंतर लंबोदर फर्स्ट क्लास मध्ये पास झालेला, गणेश धक्के खात खात... काही छोटे मोठे कोर्सेस करून तिकडे चाललेला. लंबोदर ला आधीपासून शासकीय कामात आवडत. भारतावर अफाट प्रेम पण पद मिळत नाही तो पर्यंत चार चौघात असे आत्मविश्वास कमी करणारे प्रसंग येतातच हे त्याला माहीत होतं. नातेवाईकांनी आपल्या ज्या विषयावर चर्चा केली नाही... ती आपली भक्कम बाजू समजायची. अश्या विचाराचा लंबोदर होता.

दुपारची वेळ. सर्वत्र शांतता. लँडलाईन खणखणला. आई बाबांच्या झोपेचं खोबरं होऊ नये म्हणून त्याने लगोलग उचलला.
' हॅलो... मी अक्का बोलतेय... लंबोदर का?' 
' हो अक्का मीच बोलतोय '. आता हीच काय नवीन? असा विचार त्याच्या मनात आला पण सध्या काळ वेगळा होता... ' काय झालं अक्का सगळं बरंय ना?' त्याने काळजीपूर्वक विचारले. 
' या करोना मूळे गणेश ची काळजी वाटते रे... तिकडचं सरकार काय मदत करणार पोराची? तिथे तर साधं अजून लॉक डाऊन पण नाहीये... तो इथे असता तर काळजी नसती.' ती बरीच व्यथित होती. 
' अक्का काळजी नको करू... मी सांगतो आई बाबांना तुला कॉल करायला...' त्याने जरा उरकत घेण्याच पाहिलं. 
' नाही रे... तुझ्याशीच बोलायला फोन केलेला. बरंय रे तू इथे आहेस. सर्वांची काळजी घेयला. तू आहेस तुझ्या आई बाबांसोबत... माझे तुला अनेक आशीर्वाद. तुला मनासारखी नोकरी आणि पद मिळो. उत्तम देश सेवा कर..' 
आता तिचा आवाज हेलवला होता. 
' thanks अक्का तू गणेश ची काळजी नको करू... कधीही कॉल कर. मी सांगतो आई बाबांना कॉल आलेला.' 

अक्काने यावर उत्तर न देताच कॉल कट केला. 

आरामात बसत. टीवी चा कमी केलेला आवाज परत थोडा वाढवत. चेहेऱ्यावर स्मित घेऊन तो बसला...
 दुपारच्या चहा पिताना ' लँडलाईन वाजला होता ना रे? कोणाचा होता?' आई बाबांनी विचारलं

त्यावर लंबोदर ने हसत उत्तर दिलं ' बदलेल्या दृष्टिकोनाचा'.

- दुर्गेश विवेक निसळ 

गंध

प्रत्येकाच्या काही आवडी निवडी असतात, त्या आवडी निवडींना कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा ते 'हट्ट' होऊन बसतात. जी गोष्ट माणसाला एकत्र आ...